Saturday, July 31, 2010

दिस एक जात नाही By समर्थ देर्देकर

हे गाणे माझा मित्र समर्थ देर्देकर याने आम्ही बी ई च्या शेवटच्या वर्षात असताना लिहिले होते  आणि तेच त्याच्या आवाजात त्याने बसविलेल्या चालीवर ऐकताना फार मजा यायची. त्याची आठवण सांगताना तो म्हणतो कि कुठल्याश्या घाटातून डोंगरावरून जात असताना पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग आणि उन्ह सावलीचा खेळ  पाहताना अचानक कुणाची तरी आठवण यावी आणि मन म्हणावे ---


समर्थ देर्देकर


दिस एक जात नाही आठवाविना तुझ्या गं 
अन तुझ्याबिगर न जाई पाणी आणि घास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास . . . 
.
.
भर उन्हातील तुझा शीतल सहवास सखे 
मऊ मातीतील तुझ्या पाउलखुणा 
सरी सरी मोजताना चिंब चिंब नेत्र तुझे 
हा भिजला क्षण न कधी येईल पुन्हा 
अजूनही दरवळतो मनी अंतरात सखे 
तुझ्या त्या बटांचा तो घमघम सुवास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास 
.
.
नाजूक नाजूक तुझ्या हातातील हात माझा 
आणिक तव गालांवरील रक्तिमा 
सांज सांज ढळताना सौम्य तुझ्या नेत्रातील 
अजूनही स्मरतो मज पूर्ण चंद्रमा 
अजूनही आठवतो तुझा धुंद श्वास सखे 
अशा क्षणी होई मग जिंदगी उदास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास  
.
.

आठवांचा वळीव असा कोसळे उन्हात
दिसे सप्तरंगी जादू दूर क्षितीजावरी
रंगुनी रंगात त्याच विसरुनी जातो स्वतास 
शोधतो दिशात तुझा गंध कस्तुरी
चाले किती दिवस मास ठाऊक ना या मनास 
हा असा अखंड आणि एकटा प्रवास 
शब्द नाही कानी परी भास दाटे मनी 
माझ्या डोळीयांपुढे ती तुझी मूर्ती आहे खास 

----------- समर्थ देर्देकर 

शहादत

सुखात कोसळत होता, दु:खात निनादत आहे 
पाउस कुणाचा साथी.. रोजचीच आदत आहे 

हा शब्दखेळ का सोपा ? लागावे कोणी नादी
संधान क्षेत्रपार्थांना जेमतेम साधत आहे 

संपले जरी हे श्वास, संपली तरी ना आस 
जगण्यावरती आता या मी स्वतास लादत आहे

गडे जगापलीकडले हे असे आपुले नाते 
तू तिथे उमललीस आणि मी इथे आल्हादत आहे 

कोण कसे बलीदानी ज्याचे त्याने ठरवावे 
माझ्यासाठी हे माझे जगणेच शहादत आहे ..

-----विशाल 

एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते जातात शिवालयी 
मी मादिरालायी 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते सदा नामजपात दंग 
मी नेहमी प्याल्यात धुंद 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते स्वताला म्हणवून घेतात
भक्त , विरक्त , योगी , जोगी 
मी मात्र म्हणवतो 
आसक्त , आरक्त , अनुरक्त ,भोगी 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

ते माळतात रुद्राक्ष कंठी 
मी त्याच कंठाखाली रिचवतो द्राक्षबेटी 
एवढाच काय तो फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .

त्यांना त्यागायचा आहे संसार 
मिळवायला मुक्तता 
मी तर कधीच विसरलोय दुनिया ..
मग याहून वेगळी काय असते मुक्तता 

मग आता तुम्हीच सांगा काय फरक आहे त्यांच्यात अन माझ्यात . . .
----- विशाल 

त्या रात्री पाउस होता

त्या रात्री पाउस होता 
अन गात्रांमध्ये थरथर 
जवळजवळ सरलेले 
दोघांमधले अंतर 

त्या रात्री पाउस होता
ओलावा चिंब हवेतून
पण पेटत होती काया 
त्याच्या उबदार कवेतून

त्या रात्री पाउस होता
अन हरले होते भान
ओठ बंद ओठांनी
श्वासातून उमटे तान

त्या रात्री पाउस होता
जागच्याच जागी थिजला
थेंबात मिसळला घाम की
घामाने थेंबहि भिजला 

त्या रात्री पाउस होता
साचून बंद डोळ्यात 
वेदना असो वा हर्ष 
सारेच खोलवर आर्त 

त्या रात्री पाउस होता
तो खराच किंवा भास
दरवळला तो जाईचा 
की धुंद तुझाच सुवास 

त्या रात्री पाउस होता
---- विशाल 

Saturday, July 24, 2010

कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे , 
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन्ह पडे "

प्रत्येक वर्षी श्रावण येतो ते ओठावर हे गाणे घेऊनच. तसे पाहता  मराठी महिन्याप्रमाणे श्रावण सुरु व्हायला अजून काही दिवस जायचे आहेत पण वातावरणात श्रावणाचा प्रवेश झाल्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. थोडी रिमझिम थोडी उघडीप चालू झालीच आहे . मला श्रावणाची नेहमी गम्मत वाटते म्हणजे बघा ह आज सकाळपासून पाउस थांबला होता म्हणून तिला भेटून यावे म्हंटले आणि दारातून पाय बाहेर न काढतो तोच हा मुसळधार सुरु. काल छत्री घेऊन बाहेर पडलो तर एक थेंबही आला नाही. त्याला कसे कळते असे त्रास द्यायचे.पण खरच हा त्रास आहे का ?अरे त्यामुळे तर आपल्याला भिजायची गम्मत कळते. पाउस नाही म्हणून बाहेर पडायचे... तिला भेटायचे.... तेवढ्यात पाउस सुरु... मग बोलणे लांबच... आडोसा शोधायचा... . तिच्या गालावर तोवर दोन टपोरे थेंब ओघळलेले... त्याची तारीफ करावी तर ती वळचणीतून पडणा-या पाण्याशी खेळण्यात दंग... . नंतर एवढा वेळ पावसात कुठे होतीस म्हणून आई विचारेल आता निघायला हवे  म्हंटल्यावर तिला निरोप द्यायचा.... . बर घरी भिजत एकटी कशी जाणार म्हणून स्वताच्या पैशाने रिक्षा करून द्यायची . आणि आठवणी साठवून चिंब ओले होऊन घरी परतायचे ..... खरेच दरवर्षीचा श्रावण बरेच काही देऊन जातो नाही .
अशा या श्रावणाचे वर्णन श्री सुरेश वाडकरांनी गायलेल्या या छानश्या गाण्याशिवाय पूर्ण झाले असे वाटतच नाही. मग करूया ना त्याच गाण्याने श्रावणाचे स्वागत... | 

Get this widget | Track details | eSnips Social DNA


कधी रिमझिम....
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
कधी टपो-या थेंबांचा आला ऋतू आला 
कधी पुलकित हर्षाचा, हळव्या क्षण स्पर्शाचा 
आला ऋतू आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये झुलतात गाणी दिवाणी
साद गांधाळूनी, ओल्या मातीतुनी
आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

अंग अंग स्पर्शताती मोती रुपेरी
आठवे ती अनावर भेट अधुरी 
मन चिंब ओले, शहारत बोले 
आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

हा पाऊस वागे तुझ्यासारखा 
हा येतो नि जातो तुझ्यासारखा 
ऊन पावसाचा, खेळ श्रावणाचा 
आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

Friday, July 23, 2010





|| श्री गणेशाय नमः ||
श्री गणेशा झाला ,ब्लॉग लिहायला चालू केला खरा पण सुरुवात कशाने करता येईल तेच समजत नाही. कारण ब्लॉगच नावच ठेवलंय ना ' तुम्ही म्हणाल तसं ' मग लिहिताना प्रत्येक वेळी विचार करावाच लागणार ना कि तुम्ही काय म्हणाल ?.
असो ...
सुरुवात मी माझ्या आणि  संपूर्ण मराठी रसिकांच्या लाडक्या गझल सम्राट श्री सुरेश भट यांच्या काही ओळींनी करतो . पहा आवडल्या तर -

" आता कुठे वासनेस माझ्या फुलोर आला ||
       आता कुठे काळजातला कल्लोळ मत्त झाला  ||
आता कुठे अमृतातला मी तरंग झालो ||
   आता कुठे लागली तुझी काळजी विषाला || "