निरर्थासही अर्थ भेटायचे ,
मनासारखा अर्थ लागायचा अन 
मनासारखे शब्दही यायचे ...
नदीसागराचे किनारे कधीही 
मुक्याने किती वेळ बोलायचे ,
निघोनी घरी शेवटी जात असता 
वळूनी कितीदा तरी पहायचे ...
उदासी जराशी गुलाबीच होती 
गुलाबातही दु:ख दाटायचे ,
जरा एक तारा कुठेही निखळता
नभाला किती खिन्न वाटायचे ...
असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी 
जुने पावसाळे नवे व्हायचे ,
ऋतूंना ऋतूंनी जरा भागले कि 
नव्याने जुने झाड उगवायचे ...
मनाचा किती खोल काळोख होता 
किती काजवे त्यात चमकायचे ,
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही 
मनाला किती शुभ्र वाटायचे ...
आता सांजवेळी निघोनी घरातून 
दिशाहीन होऊन चालायचे ,
जरा मीच त्यांना उरी घ्यायचे ...
जगायास तेव्हा खरा अर्थ होता 
निरर्थासही अर्थ भेटायचे ...
--- सौमित्र (किशोर कदम)

No comments:
Post a Comment