Sunday, December 8, 2019

फसलेला पानिपत

फसलेला पानिपत

तसे मी फारसे चित्रपट थिएटरला जाऊन पाहण्याचा शौकीन नाही. आणि हिंदी तर नाहीच नाही. तरीही लग्नाचा वाढदिवस साधून आणि मुलाला हत्ती घोडे लढाई पाहायला मिळेल या हेतूने काल पानिपत पाहिलाच.
तसे आशुतोष गोवरीकरांचे चित्रपट मला आवडतात पण दुर्दैवाने हा तशी छाप सोडण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. अनेक गरज नसलेले प्रसंग रंगवून आणि इतिहासातील महत्वाचे प्रसंग वगळून तीन तासाची लांबी राखली गेली आहे.

सिनेमॅटिक फ्रीडम च्या नावाखाली पार्वतीबाई आणि सदाशिव भाऊंचा रोमान्स तसेच सिनेमातील गाणी आणि नृत्य यावर मी आवर्जून बोलणार नाहीये (बोलण्यासारखे काही नाहीच त्यात हो पण आपला गश्मीर अर्जुनपेक्षा छान नाचला आहे हे नक्की) पण गोपिकाबाई आणि पर्वतीबाईंमधील वितुष्ट फक्त फॅमिली ड्रामा टच साठी दाखवल्याचा फील येतो. त्याचा मुख्य कथेशी काही संबंध लागत नाही. दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूचा प्रसंग अगदीच नाममात्र 30 सेकंडचा दाखवला आहे. याला अजून व्यापक आणि प्रभावी पद्धतीने दाखवत आले असते. पानिपतचे युद्ध मैदानावर फक्त अर्धा एक दिवस खेळले गेले पण युद्धपुर्व मैदानाच्या बाहेर घडलेल्या गोष्टींमुळे, भाऊ आणि अब्दालीमधील डावपेचांमुळे त्याला जास्त महत्व प्राप्त होते. अन्नपाण्यावाचून मराठा सैन्याची झालेली दैना आणि त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात मराठ्यांची काय परिस्थिती होती(माती खाण्याची वेळ आली होती), अब्दालीने बाटवलेले पाणी यावर काहीच भाष्य नाही. मोकळी भांडी आणि युद्धावर जाताना पार्वतीबाई भाऊसाहेबांना गुळाचे पाणी देतात आशा दोन वाक्यात हे प्रसंग संपवले आहेत.त्यादिवशी मराठ्यांचा संक्रांतीसारखा मोठा सण होता तेही कुठे येत नाही. भाऊंच्या मदतीसाठी पुण्याहून निघालेले नानासाहेब आणि त्यामुळे अब्दालीची झालेली गोची ह्याचा साधा उल्लेखही नाही. गोविंदपंतांच्या बलिदानाचाही उल्लेख येत नाही. असे अनेक प्रसंग वगळले गेले आहेत. याउलट अब्दाली आणि भाऊंची भेट हा प्रसंग ओढूनताणून केवळ "मिटटीके एक कण के लियेभी जान दे सकता हु" या एक संवादासाठी रचला आहे असे वाटते. त्यामुळे रवींद्र महाजनी (मल्हारराव होळकर), गश्मीर महाजनी(जनकोजी शिंदे) मिलिंद गुणाजी(दत्ताजी शिंदे) मोहनिश बहल (नानासाहेब पेशवे) ही पात्रे असून नसल्यासारखी वाटतात. भाऊ पार्वतीबाई आणि अब्दाली वर फोकस करायच्या नादात नजीबखानाचे महत्वाचे पात्र जवळपास आऊट ऑफ फोकस झाले आहे. अत्यंत कुटील आणि विखारी असलेले हे पात्र रंगवण्यासाठी मंत्रापेक्षा (मंत्रा हे त्या अभिनेत्याचे नाव आहे) कोणीतरी अजून ताकदीचा कलाकार हवा होता.

डायलॉग च्या बाबतीत चित्रपट पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. वरील उललेखलेल्या ऐतिहासिक घटनांच्या निमित्ताने खूप सुंदर लिहिता आले असते. पण भाऊ आणि पार्वतीबाई यांच्यातील प्रसंग सोडून इतरत्र डायलॉग जवळपास नसल्यातच जमा आहेत. (अर्जुन कपूर च्या अरोमॅंटिक डायलॉग डिलीवरीवर गोवरीकरांना शंका असावी बहुधा, पण खरे सांगतो पूर्ण चित्रपटात याच्या चेहऱ्यावरची एक रेष हलली असेल तर शप्पथ)."बचेंगे तो और भी लढेंगे" सारखे इतिहास प्रसिद्ध डायलॉगसुद्धा दुर्लक्षित आहेत.  चित्रपटात कुठेही अंगावर शहारा येत नाही, डोळे भरून येत नाही, आपण खिन्न होत नाही की देशभक्ती जागृत होत नाही. युद्धच्या तयारीच्यावेळी भाऊ दांडपट्ट्याबद्दल बोलताना दाखवला गेला आह.े युद्धातही दांडपट्टा खेळताना दिसला असता तर अजून मजा आली असती

जमेच्या बाजूंबद्दल बोलायचे झाले तर युद्धनीती छान दाखवली गेली आहे. सैन्याचे संचालन तोफांचा वापर याबाबत डिटेलिंग चांगले आहे (एक दोन सिन मध्ये टॉप अँगल शॉट एखाद्या गेम चा भाग असल्यासारखे वाटले)युद्धानंतरचे अब्दालीचे नानासाहेबांना पत्र हे माझ्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे कारण याबाबत लोकांना फारच कमी माहिती आहे.

कदाचित माझी रणांगण नाटकाची पारायणे झाली असल्याने माझ्या या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या असतील पण माझ्यामते कोणत्याही पात्राला संपूर्ण न्याय देण्यात चित्रपट फेल गेला आहे. हो पण ज्यांनी पानिपत युद्धावर काही वाचलेले नाही ज्यांनी रणांगण नाटक किंवा द ग्रेट मराठा मालिका पाहिली नाही त्यांनी पाहण्यास हरकत नाही.

- विशाल (९/१२/२०१९)

No comments:

Post a Comment