Wednesday, May 27, 2015

निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर

पुरंदर मोहिम शनिवारी (२३.०५. २०१५) फत्ते झाली.

किल्ल्याबद्दल म्हणाल तर -
" निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर" याहून दुसरे शब्द सुचत नाही.

रस्ता माहित नसल्याने आणि रस्ता चुकायची जुनी सवय असल्याने जरा लवकरच म्हणजे सकाळी ६.३० ला घरातून निघालो, सौंसोबत दुचाकीवरून हडपसर-दिवे घाट-सासवड-पुरंदर (गाव) करत किल्ल्याच्या माचीपर्यंत पोचायला ८:३० झाले. उन्ह फारसे नसल्याने प्रवास मस्त झाला. किल्ल्यावर प्रवेश ९ वाजता होतो असे तिथे समजले (ओळखपत्र आणि दुचाकीवर हेल्मेट अनिवार्य ). मग तोपर्यंत तिथेच TP केल. शनिवार असून फारसे पर्यटक दिसले नाहित. ९ ला फाटकातून gate entry करून आत सोडले.

मुरारबाजींचा पुतळा, चर्च आणि काही पडीक घरे ओलांडल्यानंतर पार्किंग आहे तेथे पुन्हा in-time entry केली. तिथे आमचे mobile जमा करून घेतले (Camera मित्राने मधुचंद्रासाठी उसना नेल्याने सोबत नव्हता. नाहीतर उगाच ओझे वाहून तेथे फोटो काढताच आले नस्ते. जे होते चांगल्यासाठी होते ) तेवढ्यात तेथे प्रतिष्ठान चा बोर्ड लावलेल्या गाडीतून ७-८ मुले आली. कदाचित नेहमीचे कार्यकर्ते असावेत. गडावर बांधकाम आणि पाईपिंग चे काम चालू असल्याने अनेक ठिकाणी खोदून ठेवले होते. आर्मीच्या जवानाने दाखवलेल्या रस्त्याने आम्ही गड दर्शन चालू केले. ५-१० मिनिटात गडाच्या बुरुजांशी भेट झाली. पहिलीच भेट असल्याने स्वराज्याच्या त्या शिलेदारांना मिठी मारून आणि त्यायोगे सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना नमन करण्याचा मोह आवरला नाही. सौना कळलेच नाही मी दगडांना का मिठी मारतोय. पण सर दरवाज्यातून आत गेल्यावर पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे एक नवीन लावलेला भगवा जरीपटका काठी मोडून बुरुजावर बाहेरच्या बाजूस उलटा झालेला (आमच्या पुढे गेलेल्या प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना तो कसा दिसला नाही याचे आश्चर्य वाटले). तो तसा ठेऊन गड बघायला जाण्यासाठी पाउल उचलेना. तसाच वर चढून जिथे त्या ध्वजाचा स्तंभ मोडलेला तेथून फिरवून काढून ध्वज सरळ करून आणि बाजूला चालू असलेल्या बांधकामातून तार आणून तेथे सौंच्या मदतीने पुन्हा उभारला ( प्रचंड वाऱ्यामुळे आणि सौंना प्रयत्न करूनही बुरुजावर येता न आल्याने ध्वजाला हव्या त्या उंचीवर उभारू शकलो नाही हि खंत मनात कायम राहील )

त्यानंतर पुढे इमारतींचे पडलेले अवशेष पहात केदारेश्वर पर्यंत पोचायला १०:३०-११:०० वाजले. तिथल्या शेवटच्या बांधीव पायऱ्या सौंशी रेस लाऊन चढल्याने लागलेला श्वास काबूत आल्यानंतर केदारेश्वराचे दर्शन घेतले. शिवतांडवाचे (हे शिव शंकराचे एकच स्तोत्र येते ) पठन करून नंतर मंदिराबाहेर वाऱ्यात बसून सोबत आणलेल्या पराठे सॉस आणि हापूस आंब्यांचा नाश्ता करून पुन्हा परतीचा मार्ग धरला. सोबत कॅमेरा नसल्याने फोटो साठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता.

उतरताना समोर आता डौलाने फडकणारा जरीपटका दिसत होता. वज्रगड समोर दिसत होता. परंतु तिकडचा प्रवेश तारांचे कुंपण टाकून बंद केला असल्याने जाउन पाहू शकलो नाही. येताना सौन्ना पुरंदरचा (माहित असलेला तसेच मिपा वरून समजलेला) इतिहास सांगत उतरलो. पुरंदरचा अर्थ, त्याचे इंद्रनील नाव, फत्तेखानचा आणि त्यारुपाने आदिलशाहीचा स्वराज्यातील पहिला मोठा पराभव, नेताजी पालकरांची किल्लेदारी, शंभू राजांचा जन्म, कापूरहोळ वरून येणारी त्यांची दुधाई. मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी, पुरंदराचा वेढा, ४० मावळ्यांनी वेढ्यात शिरून निष्क्रिय केलेल्या तोफा, वज्र गडाचा पाडाव, पुरंदरची झुंज, उडालेला बुरुज , शत्रूने सुलतानढवा करण्याआधीच मराठ्यांचा अतितटीचा हल्ला , मुरारबाजींचे शौर्य, दिलेरखानाला दिलेले प्रत्युत्तर आणि बलिदान, किल्लेदार पडल्यानंतरहि बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी चालू ठेवलेला प्रतिकार, आणि अखेर पर्यंतचे पुरंदरचे अजिंक्यत्व (माझ्या माहितीप्रमाणे झुंज चालू असतानाच पुरंदर तहात मोगलांकडे गेला, त्याचा पराभव झाला नाही कि त्याने शरणागतीहि पत्करली नाही) अशी जेवढी असेल नसेल तेवढी माहिती सौंना दिल्यानंतर मी बुरुजाला मिठी मारून नमस्कार केल्याचे कारण तिला समजले. येताना छान करवंदे (रानमेवा) जमा करीत उतरलो. खाली हॉटेल मधून पाणी घेताना जवळ पुरन्दरेश्वराचे मंदिर दिसले (थोडे आतल्या बाजूला असल्याने रस्त्यावरून सहजासहजी दिसत नाही) तेथेही बांधकाम चालू होते. पुरंदरेश्वरच्या दर्शना नंतर येताना चर्च आणि बिनी दरवाजा पाहिला. जवळ उभ्या असलेल्या जवानाला विचारून आठवण म्हणून थोडे फोटो काढले. आणि गडावरून उतरते झालो. (संभाजी राजांचे जन्मस्थान पाहू शकलो नाही. तिथे कोठेही मार्गदर्शक फलक वगैरे नसल्याने आणि केदारेश्वराच्या मुख्य रस्त्यावर ते नसल्याने त्याचे ठिकाण कळले नाही. हॉटेल मध्ये विचारणा केल्यानंतर ते वरच असल्याचे कळाले पण पुन्हा वर जाणे शक्य नसल्याने खास ते ठिकाण पहायला पुन्हा येण्याचे ठरवून आम्ही साधारण १:०० च्या सुमारास माचीवरून दुचाकी घेऊन खाली प्रस्थान केले )

परतीच्या रस्त्यावरून पुन्हा गडाच्या बुरुजाकडे नजर टाकली. येताना तेथे नसलेला जरीपटका आता डौलाने फडकताना दिसत होता. पुरंदरची ती हवा अभिमानाने उरात भरून घेतली आणि खाली उतरलो.
येताना  नारायणगावचे एकमुखी दत्त आणि केतकावळ्याचे प्रतीबालाजी यांचे दर्शन घेऊन हायवेने पुण्याकडे निघालो
खाली काही छायाचित्र देत आहे. परंतु मोबाइल चा कॅमेरा आणि भर दुपारच्या उन्हामुळे खास फोटोग्राफी करावीशी वाटली नाही आणि करूही शकलो नाही
वज्रगड, चर्च आणि बिनी दरवाजा

पुरंदरेश्वर

चर्च

बिनी दरवाजा


मुरारबाजीं
 इतिहास


परतीच्या रस्त्यावरून
 

--- विशाल