Tuesday, December 10, 2019

भारत एक खोज

पंडित नेहरूंच्या The Discovery of India या कादंबरीवर आधारित श्याम बेनेगल निर्मित भारत एक खोज ही मालिका साधारण १९९० च्या दरम्यान दूरदर्शन वर प्रदर्शित झाली होती. टेलिव्हिजन चा भारतात नुकताच प्रसार विस्तार चालू झालेल्या या काळात जेमतेम ४-५ वर्षाच्या मला यातील काही ओ की ठो कळले नव्हते. नाही म्हणायला त्याच्या टायटल सोंगमधले संगीत आणि "छुपा था क्या कीसने ढका था ... अशा काही ओळी लक्षात राहिल्या होत्या.

यानंतर जवळपास ३० वर्षांनी यु ट्यूब वर काहीतरी शोधताना याचा एक विडिओ आला. उत्सुकता जागृत झाली आणि ऑफिसच्या बसमध्ये प्रवासात रोज जमेल तसे एक दीड भाग बघत आजच ही मालिका पूर्ण केली

अत्यंत सुंदर अशी मालिका आहे. अगदी आर्यपूर्व हडप्पा संस्कृतीपासून चालू होऊन भारताच्या स्वातंत्र्यपर्यंत चा इतिहास घडलेल्या, ऐकीव किंवा समकालीन साहित्याच्या प्रसंगातून ५३ भागात मांडला गेला आहे. त्याकाळी कुठल्याही VFX शिवाय खरे खुरे सेट लावून तो काळ जिवंत केला गेला आहे. त्यावेळचे राहणीमान जीवनपद्धती त्यात होत गेलेले बदल यांचा मेळ यात दिसून येतो. अगदी हडप्पाने सुरुवात करून आर्यांचे आगमन, रामायण महाभारत गौतम बुद्ध अभिजात शाकुंतल, मौर्य  साम्राज्य, विविध साम्राज्याचे उदय अस्त, राणा सांग, पृथ्वीराज चौहान, म्लेंच्छचे आक्रमण, विविध बादशहा, मुघल साम्राज्य, ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार, 1857 चे स्वातंत्र्य समर  त्यानंतर सामाजिक चळवळी आणि लोकमान्य पर्व आणि गांधीपर्व ते स्वातंत्र्य अशा टप्याटप्याने ही मालिका उलगडत जाते. प्रत्येक भाग वेगळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे.

त्यावेळच्या नावाजलेल्या टीव्ही तसेच सिनेमा कलाकारांनी यात विविध भूमिका केल्या आहेत. ओम पुरी सारखा दिग्गजाने रावण, दुर्योधन, औरंगजेब, राजा कृष्णदेवराय, सम्राट अशोक आणि इतर अनेक व्यक्तिरेखानसोबतच आपल्या खर्जातील आवाजात या मालिकेचे निवेदन ही केले आहे. याव्यतिरिक्त पल्लवी जोशी, इरफान खान, पियुष मिश्रा, इला अरुण, कुलभूषण खरबंदा (अकबर), अलोकनाथ(स्वामी विवेकानंद), मोहन गोखले (गोविंद रानडे), सदाशिव अमरापूरकर (ज्योतिबा फुले) शुभांगी गोखले (सावित्रीबाई फुले), शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह ( छत्रपती शिवाजी) हेही या मालिकेत दिसून येतात. अजित करकरे, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यासारख्या मराठी गायकांनी गाणी गायली आहेत

या मालिकेतील प्रसंगांच्या पुराव्याबाबत, खऱ्या इतिहासबाबत, पंडित नेहरूंच्या दृष्टिकोणाबाबत अनेक वादविवाद आहेत पण एक सुंदर मालिका म्हणून पाहण्यास हरकत नाही. IMDB वर 8.9 रेटिंग आहे आणि यु ट्यूबवर सर्व 53 भाग मोफत उपलब्ध आहेत.

-विशाल (१०/१२/२०१९)

Sunday, December 8, 2019

फसलेला पानिपत

फसलेला पानिपत

तसे मी फारसे चित्रपट थिएटरला जाऊन पाहण्याचा शौकीन नाही. आणि हिंदी तर नाहीच नाही. तरीही लग्नाचा वाढदिवस साधून आणि मुलाला हत्ती घोडे लढाई पाहायला मिळेल या हेतूने काल पानिपत पाहिलाच.
तसे आशुतोष गोवरीकरांचे चित्रपट मला आवडतात पण दुर्दैवाने हा तशी छाप सोडण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. अनेक गरज नसलेले प्रसंग रंगवून आणि इतिहासातील महत्वाचे प्रसंग वगळून तीन तासाची लांबी राखली गेली आहे.

सिनेमॅटिक फ्रीडम च्या नावाखाली पार्वतीबाई आणि सदाशिव भाऊंचा रोमान्स तसेच सिनेमातील गाणी आणि नृत्य यावर मी आवर्जून बोलणार नाहीये (बोलण्यासारखे काही नाहीच त्यात हो पण आपला गश्मीर अर्जुनपेक्षा छान नाचला आहे हे नक्की) पण गोपिकाबाई आणि पर्वतीबाईंमधील वितुष्ट फक्त फॅमिली ड्रामा टच साठी दाखवल्याचा फील येतो. त्याचा मुख्य कथेशी काही संबंध लागत नाही. दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूचा प्रसंग अगदीच नाममात्र 30 सेकंडचा दाखवला आहे. याला अजून व्यापक आणि प्रभावी पद्धतीने दाखवत आले असते. पानिपतचे युद्ध मैदानावर फक्त अर्धा एक दिवस खेळले गेले पण युद्धपुर्व मैदानाच्या बाहेर घडलेल्या गोष्टींमुळे, भाऊ आणि अब्दालीमधील डावपेचांमुळे त्याला जास्त महत्व प्राप्त होते. अन्नपाण्यावाचून मराठा सैन्याची झालेली दैना आणि त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात मराठ्यांची काय परिस्थिती होती(माती खाण्याची वेळ आली होती), अब्दालीने बाटवलेले पाणी यावर काहीच भाष्य नाही. मोकळी भांडी आणि युद्धावर जाताना पार्वतीबाई भाऊसाहेबांना गुळाचे पाणी देतात आशा दोन वाक्यात हे प्रसंग संपवले आहेत.त्यादिवशी मराठ्यांचा संक्रांतीसारखा मोठा सण होता तेही कुठे येत नाही. भाऊंच्या मदतीसाठी पुण्याहून निघालेले नानासाहेब आणि त्यामुळे अब्दालीची झालेली गोची ह्याचा साधा उल्लेखही नाही. गोविंदपंतांच्या बलिदानाचाही उल्लेख येत नाही. असे अनेक प्रसंग वगळले गेले आहेत. याउलट अब्दाली आणि भाऊंची भेट हा प्रसंग ओढूनताणून केवळ "मिटटीके एक कण के लियेभी जान दे सकता हु" या एक संवादासाठी रचला आहे असे वाटते. त्यामुळे रवींद्र महाजनी (मल्हारराव होळकर), गश्मीर महाजनी(जनकोजी शिंदे) मिलिंद गुणाजी(दत्ताजी शिंदे) मोहनिश बहल (नानासाहेब पेशवे) ही पात्रे असून नसल्यासारखी वाटतात. भाऊ पार्वतीबाई आणि अब्दाली वर फोकस करायच्या नादात नजीबखानाचे महत्वाचे पात्र जवळपास आऊट ऑफ फोकस झाले आहे. अत्यंत कुटील आणि विखारी असलेले हे पात्र रंगवण्यासाठी मंत्रापेक्षा (मंत्रा हे त्या अभिनेत्याचे नाव आहे) कोणीतरी अजून ताकदीचा कलाकार हवा होता.

डायलॉग च्या बाबतीत चित्रपट पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. वरील उललेखलेल्या ऐतिहासिक घटनांच्या निमित्ताने खूप सुंदर लिहिता आले असते. पण भाऊ आणि पार्वतीबाई यांच्यातील प्रसंग सोडून इतरत्र डायलॉग जवळपास नसल्यातच जमा आहेत. (अर्जुन कपूर च्या अरोमॅंटिक डायलॉग डिलीवरीवर गोवरीकरांना शंका असावी बहुधा, पण खरे सांगतो पूर्ण चित्रपटात याच्या चेहऱ्यावरची एक रेष हलली असेल तर शप्पथ)."बचेंगे तो और भी लढेंगे" सारखे इतिहास प्रसिद्ध डायलॉगसुद्धा दुर्लक्षित आहेत.  चित्रपटात कुठेही अंगावर शहारा येत नाही, डोळे भरून येत नाही, आपण खिन्न होत नाही की देशभक्ती जागृत होत नाही. युद्धच्या तयारीच्यावेळी भाऊ दांडपट्ट्याबद्दल बोलताना दाखवला गेला आह.े युद्धातही दांडपट्टा खेळताना दिसला असता तर अजून मजा आली असती

जमेच्या बाजूंबद्दल बोलायचे झाले तर युद्धनीती छान दाखवली गेली आहे. सैन्याचे संचालन तोफांचा वापर याबाबत डिटेलिंग चांगले आहे (एक दोन सिन मध्ये टॉप अँगल शॉट एखाद्या गेम चा भाग असल्यासारखे वाटले)युद्धानंतरचे अब्दालीचे नानासाहेबांना पत्र हे माझ्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे कारण याबाबत लोकांना फारच कमी माहिती आहे.

कदाचित माझी रणांगण नाटकाची पारायणे झाली असल्याने माझ्या या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या असतील पण माझ्यामते कोणत्याही पात्राला संपूर्ण न्याय देण्यात चित्रपट फेल गेला आहे. हो पण ज्यांनी पानिपत युद्धावर काही वाचलेले नाही ज्यांनी रणांगण नाटक किंवा द ग्रेट मराठा मालिका पाहिली नाही त्यांनी पाहण्यास हरकत नाही.

- विशाल (९/१२/२०१९)

Tuesday, December 3, 2019

अडगळीला नवी जाग यावी पुन्हा - गोविंद नाईक

अडगळीला नवी जाग यावी पुन्हा
एक चिठ्ठी तुझी सापडावी पुन्हा

रंग आता नको कोणताही मधे
थेट स्पर्शातली भेट व्हावी पुन्हा

एवढे चांदणे पसर शेजेवरी
की घडीने घडी विस्कटावी पुन्हा

आजही घर तुझे सापडेना मला
पावलांची नजर घुटमळावी पुन्हा

अंतरंगातला भोवरा थांबला
एक गिरकी तिने आज घ्यावी पुन्हा

गोविंद नाईक