Wednesday, May 15, 2013

जेवणाची चव

लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची.  ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची.  फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती  त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे.

काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून  भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी ….  और पाच कि मिरची देना"

बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले
---- विशाल (ठाणे १५.०५.२०१३ )


No comments:

Post a Comment