Monday, May 7, 2018

गोंधळ

रंगतात चर्चा चौघीजणीत माझ्या
का तू अजूनही आठवणीत माझ्या

सरी दुःखाच्या पुरत्या ओसरल्या कोठे
गळतो मी रोज वळचणीत माझ्या

गझला नि लावण्या दिल्या मी किती तुला
हाती निदान दे तू सुनीत माझ्या

लोक मला बोलती शांततेचा पुजारी
मनात आत चालू गोंधळ नित माझ्या

मदतीचा हात दिला ज्यांना, त्यांनीच आज
तोंडे हो फिरवली अडचणीत माझ्या

वार्षिकेत प्रगतीच्या नको सोडू वाफा
पास तरी हो आधी चाचणीत माझ्या

तहानल्या जीवाची हाक ऐकली आणि
पाणी ओतले त्यांनी चाळणीत माझ्या

घामाचे पीक माझे कापून नेले कोणी
उरला कडबाच फक्त कापणीत माझ्या

मराठी, कला, शास्त्रे घेऊनि गेलो पुढे
का हे आले मागे बीजगणित माझ्या

शरण जाऊनि जीवाचे दान मिळविले पहा
राहिलो मी एकटाच छावणीत माझ्या

विरहाच्या अश्रूंचा पुर ओसरून गेला
आता तुझा निवास पापणीत माझ्या

दाग दागिने वस्त्रे ओरबाडूनी नेली
नेले पण मला न कोणी वाटणीत माझ्या

करण्या पापे भस्म होईल ज्याचा वणवा
निखारा असे कुठे तो अग्नीत माझ्या

कितीच खून पाडले । जिंकल्या किती लढाया
बळ सहस्त्र समशेरींचे लेखणीत माझ्या

दंश करणारा आता मी सर्प कुठे शोधू
मी साप पाळतोय अस्तनीत माझ्या

शब्दगंध नसे ज्यांना तेच बरळले पुढे
"कविता झाली नाही धाटणीत माझ्या"
- विशाल (२७/०५/२००८)

No comments:

Post a Comment